नागपूर : येत्या
22 ते 25 ऑक्टोबरपर्यंत दीक्षाभूमी येथे 56 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन
सोहळा साजरा होत आहे. त्या निमित्त्ताने जिल्हा प्रशासन, नागपूर
महानगरपालिका, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, वीज वितरण विभाग यांनी दरवर्षी
प्रमाणे यंदाही चोख व्यवस्था ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी
केले.
![]() | |
सौजन्य: महान्यूज |
बचत भवन सभागृहात 56 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या सोहळ्याची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टिकोनातून एक बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी सौरभ राव होते. या बैठकीस नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे निवृत्त सदस्य सचिव ई. झेड. खोब्रागडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राव म्हणाले, धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा 23 व 24 ऑक्टोबर रोजी होणार असून या सोहळ्यात यावर्षी देशातून तसेच विदर्भ, मराठवाड्यातून 10 लाख भाविक उपस्थित राहतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांची व्यवस्था करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. नागपूर महानगरपालिके तर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, साफसफाई, वाहतूक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था तसेच पाऊस आल्यास भाविकांना आश्रयासाठी शाळांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
पोलिस विभागातर्फे सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरु राहील. सोबतच डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील एन.सी.सी व एन.एस.एस.च्या स्वयंसेवकांची मदत पोलिसांना होणार आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून सी.सी.टीव्ही लावण्यात येणार आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 7 मार्च 2005 च्या निर्देशानुसार 21 मुद्यांवर संपूर्ण आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. दीक्षाभूमी परिसरात दुकानदारांनी सिलेंडर, स्टोव्ह, लाऊडस्पिकर आणू नये अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या वेळी एक दोन दिवस आधी विविध सामाजिक संस्था, संघटनांतर्फे भाविकांसाठी करण्यात येणाऱ्या अन्नदाना संदर्भात विशेष काळजी घ्यावी. अन्न व औषधी प्रशासनाने अन्न पदार्थांचे नमुने तपासावे, अशी सूचनाही बैठकीत करण्यात आली. तीन दिवस चालणाऱ्या सोहळ्यात भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महानगरपालिकेचे आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य सेवा उपसंचालक यांनी संयुक्त रित्या बैठक घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय तसेच खाजगी रुग्णालयांत वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यासोबत चार मोबाईल आरोग्य रुग्णवाहिका तसेच तातडीची औषधे उपलब्ध ठेवावी, असेही बैठकीत संबंधितांना जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा